पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद

लासलगाव www.pudhari.news

लासलगाव( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेशवर धरणामुळे गेल्या २० ते २२ दिवसांपासून लासलगावात न‌ळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही. हक्काचे पाणी मिळण्यासाठी शनिवारी (दि. ११) लासलगावमधील रहिवाशी, व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. (Water scarcity)

जलवाहिनीत ठिकठिकाणी गळती, वीजपंप नादुरुस्त होणे, वीज पुरवठा खंडित व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यामुळे लासलगावकरांना अनेक दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. लहान लहान मुले, महिला व पुरुष वर्ग आपले काम धंदे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवन करताना दिसत होते. तर लासलगाव व परिसरातील नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न असून सर्व सामान्य नागरिक मात्र पाणी प्रश्नासाठी लढताना दिसत आहे.

मतदानावर बहिष्कार

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला. यानंतर प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ उपयोजना करून वालदेवी मुकणे व दारणातून पाणी सोडून लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडले. मात्र शनिवारी दुपारपर्यंत गावात कुठेही पाणी आलेल नाही.

हेही वाचा –